पानीपत : “काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या पूर्वजांनीही संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केलाच होता. त्यामुळे आम्हाला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, त्यांनी थोडे जबाबदारीने बोलाले पाहिजे. आणिबाणीच्या काळात मी स्वतः देखील तुरुंगात होतो. ज्यांनी देशाला तुरुंग बनवले होते, त्यांनी त्याबद्धल आजतागायत देशाची माफी मागितलेली नाही”, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधी यांना (RSS Reaction on Rahul Gandhi`s Statements) त्यांच्या विदेशातील विधानांबद्धल फटकार लगावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी याबाबत विचारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. हरियाणातील समालखा येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. राहुल गांधींचा स्वत:चा राजकीय अजेंडा आहे. संघाचे सत्य सर्वांनाच माहित आहे. तरीही देशाच्या प्रमुख विरोधी पक्षाचे मोठे नेते असल्याने राहुल गांधींनी अधिक जबाबदारीने बोलावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी समलिंगी विवाहाबाबत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. विवाह केवळ विरुद्ध लिंगाच्या लोकांमध्येच होऊ शकतो. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार आहे. तो करार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रविवारपासून पानीपत परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू आहे. देशभरातून ३४ संघटनांचे १४७४ प्रतिनिधी या सभेत सहभागी झाले आहेत. प्रतिनिधी सभेने पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीआधी देशात एक लाख ठिकाणांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प सोडला आहे. ४२% शाखांचे वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. सध्या देशाला ७१,३५५ ठिकाणी संघ कोणत्या ना कोणत्या रूपात कार्य करत असल्याची माहिती देण्यात आली