Home Artical Blog “चालू या आरोग्यासाठी” वॉकथॉनद्वारे जनजागृती

“चालू या आरोग्यासाठी” वॉकथॉनद्वारे जनजागृती

0

सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता –
डॉ. मिलिंद कांबळे

चंद्रपूर(Chandrapur), दि. ८ एप्रिल २०२६:

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शहरात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “चालू या आरोग्यासाठी” या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी, लोकमत सखी मंच, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), स्त्री व प्रसूती रोग विशेषज्ञ संघटना चंद्रपूर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर तसेच टाटा कॅन्सर फाउंडेशन, चंद्रपूर
इंडियन डेंटल असोसिएशन, शासकीय नर्सिंग कॉलेज चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले.
सदर वॉकथॉन सकाळी ७ वाजता गांधी चौक ते जटपूरा गेट या मार्गावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या वॉकथॉनमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्याविषयी जागरूकतेचा संदेश दिला.
या उपक्रमात चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, महाराष्ट्र आय.एम.ए.चे माजी उपाध्यक्ष तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कल्पना गुलवाडे, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. मनीषा मुंदडा, इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष पंकज कावळे , डॉ. विलास मुळे, डॉ. उषा अरोरा, टाटा कॅन्सर फाउंडेशनचे डॉ. आशिष बारब्दे, रेड क्रॉस सोसायटीचे शादाब चिनी, डॉ. पियुष मेश्राम, निलेश पाझारे डॉ. किरण जानवे, डॉ. महेश भांडेकर, डॉ. गोपाल राठी, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. हर्ष मामीडवार, एस.पी. कॉलेजचे कुलदीप गोंड, डॉ. भार्गव बांडे, अश्विनी खोब्रागडे, डॉ. विनोद नगराळे, डॉ. पूनम नगराळे यांच्यासह अनेक मान्यवरांची व नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना डॉ. मिलिंद कांबळे यांनी सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, चालणे, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.
या वॉकथॉनमध्ये सहभागी नागरिकांनी विविध फिटनेस उपक्रम, कवायती आणि घोषणांद्वारे “आरोग्यम धन संपदा ” हा संदेश दिला.
विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरला.
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे आणि निरोगी समाज घडविणे या उद्देशाने करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संस्था, मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.