उल्हासनगर घटनेची सखोल चौकशी व्हावी- चंद्रशेखर बावनकुळे

0

 

नागपूर -उल्हासनगर हल्ला प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य कारवाई करेल, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोलपर्यंत जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी बोलत होते. मी घेतलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या जिवावर आले म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले, असे गायकवाड म्हणत आहेत. सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही. चूक कुणाचिही असली तरी, असे अपेक्षित नाही. हे संस्कार आपले नाहीत. समाजाला यातून वाईट संदेश जातो, समाजापर्यंत वाईट संदेश पोहोचू नये. यात ज्याची चूक असेल त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, अशा घटनांमुळे पक्षाची काही प्रमाणात बदनामी होते. मात्र चौकशी होऊन घटना समजून घेतली जाईल.विरोधी पक्षाचे कामच राजीनाम्याची मागणी करण्याचे आहे, असे ते म्हणाले.
अडवाणीजींना भारतरत्न, आनंदाची, अभिमानाची बाब!
या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत आनंददायी, सुखद व भिमानाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया श्री बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. अंत्योदयाकरिता संपूर्ण आयुष्य अटलजींच्या नेतृत्त्वात समर्पित केले. भाजपाला शुन्यातून जगातला सर्वांत मोठा पक्ष करण्यात त्यांचा मोठे योगदान आहे. देशासाठी केलेल्या सर्मपणाचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला आहे. अडवाणीजी यांना ‘भारतरत्न’ घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतानाच त्यांनी त्यांच्याशी निगडित आठवणींना उजाळा दिला.