
Nagpur, 29 April 2025 :
एआयडीच्या पुढाकाराने विविध विषयांवर झाली चर्चा
नागपूर, 29 एप्रिल
विदर्भाला ज्ञानाधारित उद्योगांचे केंद्र म्हणून चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) ने थॉलन्स इंक.चे अध्यक्ष आणि सीईओ श्री अविनाश वशिष्ठ यांची नागपूर भेट घडवून आणली. या भेटीमध्ये अविनाश वशिष्ठ हे नागपुरात जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर – जीसीसी) स्थापन करण्यासाठी आणि आयटी व सेवा क्षेत्रांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून आले.
थॉलन्स ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त धोरणात्मक सल्लागार फर्म असून जागतिक आउटसोर्सिंग, इनोव्हेशन इकोसिस्टम्स आणि गुंतवणूक सल्लागार क्षेत्रात काम करते. या कंपनीने भारत, लॅटिन अमेरिका, पूर्व युरोप आणि फिलीपिन्समध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) आणि ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस (जीबीएस) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, वशिष्ठ यांनी मध्य प्रदेश सरकारसाठी जीसीसी धोरणाचा मसुदा तयार करण्यासह भारताच्या जीसीसी इकोसिस्टममध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते अॅसेन्चर इंडियाचे माजी अध्यक्ष आणि एमडी देखील होते.
अविनाश वशिष्ठ यांनी या भेटीदरम्यान मिहानच्या सेझ व बिगर सेझ भागांचा दौरा केला आणि येथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि क्षेत्रातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या उपस्थितीबद्दल कौतुक केले. त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी व मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपिन इटनकर यांच्याशी चर्चा केली. श्री वशिष्ठ यांनी नागपुरात जीसीसी स्थापन करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक शिफारशी आणि आवश्यकतांची माहिती दिली. डॉ. इटनकर यांनी त्यांना सर्व प्रकारचे प्रशासकीय व धोरणात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
वशिष्ठ आयआयएम नागपूरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल मकरंद अलूर (निवृत्त) यांच्याशी चर्चा केली व थॉलन्सच्या सहकार्याने आयआयएममध्ये तंत्रज्ञान प्रगती आणि उद्योजकता या विषयावर विशेष अभ्यासक्रम प्रस्तावित केला. वशिष्ठ यांनी अॅडव्हांटेज विदर्भ आयोजन समितीचे अध्यक्ष माजी खासदार अजय संचेती यांचीही भेट घेतली.
श्री वशिष्ठ यांनी नागपूरच्या मजबूत पायाभूत सुविधा, कुशल टॅलेंट पूल आणि संस्थात्मक सहाय्य हे जागतिक क्षमता केंद्रे विकसित करण्यासाठी आदर्श घटक असल्याचे नमूद केले. नागपूर हे धोरणात्मक गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी एआयडीचे सचिव डॉ. विजय शर्मा, कार्यकारी समिती सदस्य विनोद तांबी, आयटी क्षेत्र संयोजक अजय कपूर यांच्यासह एचसीएल टेकचे शैलेश आवळे, टीसीएसचे अरविंद कुमार, टेक महिंद्राचे मनीष अग्रवाल आणि आदित्य भाटिया, इन्फोसिसचे रचित भंडार आणि राहुल करंगळे, प्राग्मॅटिक लि. आकाश सिंग आणि एआयडीचे पंकज भोकारे यांची उपस्थिती होती.