आव्हाड शिंदे-फडणवीस आज एकाच मंचावर

0

राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हे


ठाणे. हर हर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याप्रकरणी पोलीस कारवाईचा सामना करावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahd) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना शनिवारी याप्रकरणात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर नवा पूल उभारला आहे. या पूलाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूलाचे लोकार्पण होईल. यावेळी देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित असतील. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज जितेंद्र आव्हाड आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


व्हिव्हियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावरुन सध्या वातावरण तापले आहे. पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. मात्र, यामुळे सध्या शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षाचे पडसाद कळव्यातील कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली होती. एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे, ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल आहे. त्यामुळे आव्हाड हे कायमच कुठल्याही गोष्टीचे अशाप्रकारे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपटगृहात जो तमाशा केला, जी मारहाण केली, त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. कोणीही अशाप्रकारे कायदा हातात घेतला असता तर त्याच्यावर हीच कारवाई झाली असती. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आपण खूप काही मोठे केले आहे, हे दाखवण्याच्या नादातून सगळ्या गोष्टी घडल्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पोलिसांनी आव्हाड यांना शनिवारी ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नातेवाईकांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला होता. पोलिसांना सतत एका चाणक्याचे फोन येत आहेत. पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आणला जात आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे समजते. या चाणक्याकडून जितेंद्र आव्हाड यांना पोलीस कोठडीत जेवणही मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे हा चाणक्य नक्की कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

*रैवीओली आणि स्टफ मशरूम रेसिपी | Ravioli & Stuffed Mushrooms Recipe | Episode 31 | Shankhnaad News*