नवाब मलिकांच्या महायुतीतील एंट्रीला भाजपचा तीव्र विरोध

0

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस  NCP पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यात भाजपने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात Deputy Chief Minister Devendra Fadnavis Deputy Chief Minister Ajit Pawar उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून आपला आक्षेप नोंदविला आहे. “ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे”, असे फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. “त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे”, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. (BJP Oppose Nawab Malik)

बुधवारी सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक हे विधान सभेत अजित पवार गटातील सदस्यांसह बसले होते. त्यावरुन ते अजित पवार गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याचवेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी सदस्यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधत दुटप्पीपणाचे आरोप केले. फडणवीस यांनीही त्याला उत्तर दिले. मात्र, भाजपने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेत नवाब मलिकांच्या महायुतीतील सहभागास विरोध दर्शविला आहे. फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास पण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.”