‘अभिव्यक्ती’चा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा; बालसाहित्यावर काय म्हणाले माजी कुलगुरू

0

चांगला विचार देणारे बालसाहित्य हवे – पंकज चांदे

‘अभिव्यक्ती’चा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा

‘बालसाहित्याचा विचार हा फक्त बालकांसाठीचे साहित्य या दृष्टिकोनातून होऊ शकत नाही. उद्याचा चांगला नागरिक म्हणजे आजची बालके होय. चांगला तसेच वाईट विचारांचा प्रभाव लवकर त्यांच्या बालमनावर होतो. त्यामुळे चांगला विचार देणाऱ्या बालसाहित्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे’, असे मत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.

‘अभिव्यक्ती- वैदर्भीय लेखिकांची’ संस्थेचा ४८वा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात डॉ. चांदे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक व साहित्य विहार अध्यक्ष आशा पांडे, माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार आणि संस्थेच्या अध्यक्ष स्वाती सुरंगळीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी ‘अभिव्यक्ती २०२५’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक आशा पांडे यांना राधाबाई बोबडे स्मृती साहित्य सौदामिनी पुरस्कार आणि माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांना कुसुमताई वांकर स्मृती तेजस्विनी सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.

साहित्य पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट कादंबरी प्रकारात ‘सीता’ कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर, सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र प्रकारात ‘विवाह नाकारतांना’च्या लेखिका विनया खडपेकर आणि सर्वोत्कृष्ट वैचारिक लेखसंग्रहामध्ये ‘समृद्ध पालकत्व’च्या लेखिका डॉ. अदिती काळमेख यांनाही शाल, स्मृतिचिन्हआणि तीन हजार रुपये असा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपासना कला केंद्राच्यावतीने ‘ज्ञानियांचा राजा’ ही नृत्यनाटिका प्रस्तुत करण्यात आली. यामध्ये सृष्टी माटे, मृण्मयी चाफळे, जान्हवी पिल्लारे, कनक जैन, कल्याणी वेलणकर आणि वृषाली साठे यांनी उत्तम सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा देशपांडे-मुलमुले यांनी केले तर आभार सचिव अंजली पांडे यांनी मानले. यावेळी हेमा नागपूरकर, मीनल येवले, विनीता हिंगे, वृषाली देशपांडे, अंजली दुरुगकर, प्रा. विवेक अलोणी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.