
व्हीएनआयटीमध्ये ‘बजेट 2025 आणि विकसीत भारत’ वर व्याख्यान
विकसीत भारत साकार करण्यासाठी अर्थसंकल्प हे एक माध्यम असून हे स्वप्न साकार करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अभियंते हे निर्माण करता असून समाजाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुमच्यासारखे हुशार अभियंते ज्यावेळी शिक्षक बनतील त्या दिवशी भारत ख-या अर्थाने ‘विकसीत भारत’ झाला असे म्हणता येईल, असे मत सीए मिलिंद कानडे यांनी व्यक्त केले.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान, नागपूरच्यावतीने ‘बजेट 2025 आणि विकसीत भारत’ या विषयावर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नेपा लिमिटेडचे संचालक सीए मिलिंद कानडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्हीएनआयटीच्या सिनेट हॉलामध्ये गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमाला व्हीएनआयटीचे संचालक प्रेमलाल पटेल, अॅकॅडमीक्सचे अधिष्ठाता प्रा. व्ही. आर. कळमकर, स्टुडंट वेलफेअरचे अधिष्ठाता प्रा. रत्नेश कुमार, संयोजक प्रा. पी. एस. कुळकर्णी तसेच, पीएचडी स्कॉलर्स, भावी अभियंते, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
मिलिंद कानडे यांनी अर्थसंकल्पाचे विस्तृत विवेचन करताना ‘विकसीत भारत’ ही संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट केली. देशाचे दरडोई उत्पन्न जेव्हा वाढेल आणि अमेरिका, युरोपमध्ये शिक्षण, नोकरीसाठी जाणा-या युवकांची संख्या कमी तेव्हाच देश विकासीत झाला असे म्हणता येईल. ‘इनोव्हेशन’ हा यशाचा मार्ग असून युवकांनी नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे, स्वयंरोजगार निर्माण करावा, असे ते म्हणाले.