नवी दिल्ली (New delhi ) :- महाराष्ट्र आणि एकूणच भारतात जंगलाचे प्रमाण तांत्रिकदृष्ट्या वाढले असले तरी वनाच्छादित जमिनीच्या वाढीचा दर मात्र घसरला आहे. दरम्यान, एकूणच जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्येही किंचित असली तरी घट झाल्याची नोंद शासनदरबारी झाली आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचा गत वर्षीचा अहवाल नुकताच नवी दिल्लीमधे प्रकाशित झाला. या अहवालात नमूद आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांमध्ये भारताच्या वन आच्छादनामध्ये १ हजार ४४५ चौ.किमीने वाढ झाली असून, महाराष्ट्रातील वन आच्छादनामध्ये केवळ १६.५३ चौ.किमीने वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’चे प्रकाशन नुकतेच झाले. मागील सुमारे ३७ वर्षांपासून भारतीय वनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
केंद्र सरकारच्या ‘भारतीय वन सर्वेक्षण’ विभागाकडून या संदर्भातील कार्य केले जाते. दर दोन वर्षांनी भारतातील वनांचे राज्य निहाय सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्याचे काम या विभागाच्या माध्यमातून केले जाते. याआधीच्या दोन वर्षांच्या अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील वनक्षेत्रात २० चौ.किमी क्षेत्राची वाढ झाली होती. यामध्ये चार चौ.किमीची घट होऊन गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यातील वन आच्छादन केवळ १६ चौ.किमीने वाढले आहे. महाराष्ट्राचे अधिसूचित केलेले भौगोलिक क्षेत्र हे ३ लाख ०७ हजार ७१३ चौ.किमी आहे. त्यामधील हरित क्षेत्र हे ६१ हजार ९५२ चौ.किमी असून एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते २०.१३ टक्के आहे.
२०२१ साली राज्याचे वन आच्छादित क्षेत्र हे ५० हजार ७९८ होते. २०२३ साली त्यामध्ये १६.५३ चौ.किमीने वाढ होऊन ते ५० हजार ८५८ चौ.किमी झाले आहे. या संस्थेच्या यंदाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक वन आच्छादित क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात १० हजार ०१५ चौ.किमी वन आच्छादित क्षेत्र असून, त्यामध्ये गेल्या दोन वर्षात ६९.४९ चौ.किमीने वाढ झाली आहे, जी राज्यात सर्वाधिक आहे. तर मुंबई शहरात ४.४२ चौ.किमी असे सर्वाधिक कमी वन आच्छादित क्षेत्र असून त्यामध्ये ०.२२ किमीने वाढ झाली आहे. वन वणव्यात घट वन वणव्यांमध्ये २०२१ साली महाराष्ट्र हा देशात तिसऱ्या स्थानावर होता. २०२३ साली तो पाचव्या स्थानावर आला आहे. २०२२-२३ या सालात राज्यात वन वणव्याच्या १६ हजार ११९ घटनांची नोंद झाली होती. तर २०२३-२४ सालात १६,००८ घटनांची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वाधिक वन वणव्याच्या नोंदी गडचिरोली वन परिसरातच झाल्या आहेत.
New Delhi Railway station