
मुंबई (Mumbai) -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई करावी, या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही निर्णय घेतला नसल्याने आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा सुर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) दरवाजा ठोठावला आहे. सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेच आता काय तो निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार (Sunil Parabhu) सुनील प्रभू यांनी याचिकेत केली आहे. (shivsena-supreme-court-maharashtra-political-news)
विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घायला सांगितले होते. या आमदारांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. अध्यक्षांनी वाजवी वेळेत निर्णय द्यावा, असेही निकालात नमूद होते. मात्र, यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन देण्यात आले. पण, त्याचाही परिणाम झाला नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.