
– एकपात्री नाट्यप्रयोगातून सावरकर युगाचे स्मरण
– अभिवादन शेवाळकर महोत्सवाचा शुभारंभ
– श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट उपक्रम
(Nagpur):नागपूर, 1 मे
स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर भारतीय स्वातंत्र्यसमरातील जाज्वल्य यज्ञकुंड, त्यांचे भाऊ आणि तिन्ही भावांच्या पत्नींनी देशभक्तीच्या या धगधगत्या होमकुंडात दिलेली आहुती व पुढचा कष्टप्रद जीवनप्रवास अतिशय परिणामकारक पद्धतीने
पुण्याच्या अपर्णा चोथे यांनी रसिकांपुढे मांडला आणि त्यांच्या सादरीकरणामुळे सावरकर युगाचे स्मरणही झाले.
या एकपात्री नाट्यप्रयोगातून अपर्णा चोथे यांनी, यमुना, शारदा व येसूवहिनी या तिन्ही व्यक्तिरेखांना अभिनयातून समर्थपणे अधोरेखित केल्या. मुख्य म्हणजे हा नाट्यप्रयोग खर्या अर्थाने एकपात्री ठरला. या नाटकाची संकल्पना, संहिता लेखन, नेपथ्य, वेशभूषा यासोबतच दिग्दर्शन आणि सादरीकरण या सर्व जबाबदार्या अपर्णा चोथे यांनी समर्थपणे पार पाडल्या. या नाटकाचे संगीत नियोजन अजित यशवंत यांनी तर प्रकाश योजना संकेत पारखे यांचे होते.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तर्फे स्थानिक लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानावर थोर विचारवंत राम शेवाळकर स्मृतिप्रित्यर्थ त्रिदिवसीय अभिवादन शेवाळकर महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचा शुभारंभ आणि त्यातील पहिले पुष्प म्हणून स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात विरांगना ‘त्या तिघी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर, उद्योजक आशुतोष शेवाळकर, माधव सरपटवार, कलावंत प्रफुल्ल माटेगावकर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्रीपाद अपराजित यांनी, नानासाहेबांचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम
आ. संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे, हा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून प्रफुल्ल माटेगावकर यांनी, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट सांस्कृतिक कार्यक्रमासोबत दीनदयाल थाली, कोरोना काळात विधवांचे पुनर्वसन आदी उपक्रम आ. संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात होत असल्याचे सांगितले.
चौकट
शेवाळकरांचे स्मरण प्रेरणादायी : राहुल पांडे
नानासाहेब शेवाळकर हे सर्वांसाठी आधारवड होते, त्यांचा व्यासंग दांडगा होता, अशा व्यक्तिमत्वाचे स्मरण प्रेरणादायी आहे, आणि त्याची आठवण ठेवत त्यांचा वारसा पुढच्या पिढीपयर्र्त नेण्याचे काम या महोत्सवातून होणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.