
ज्ञानेश वाकुडकर
विदर्भ साहित्य संघ (c/o निलावार साडी सेंटर) नागपूर(Nagpur) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कधी नव्हे ती भलतीच गाजते आहे.
१. मुळात ती संस्था आज स्वतःचा आत्मा, कणा आणि प्रतिष्ठा गमावून बसलेली सत्वहिन संस्था आहे.
२. मात्र त्या संस्थेचा भूखंड/त्यावर होऊ शकणारा बांधकाम प्रकल्प अरबो रुपयांचा आहे. (तो हडपण्यासाठीच ही लढाई सुरू आहे, अशी एपस्टीन फाईलच्या बरोबरीने खमंग चर्चा सध्या रंगलेली दिसते!)
३. स्वतंत्र साहित्यिक कर्तृत्व, प्रतिष्ठा, ताठ कणा आणि दूरदृष्टी असणारा एखादा मान्यवर साहित्यिक या संस्थेचा अध्यक्ष व्हावा आणि संस्थेची रसातळाला गेलेली प्रतिष्ठा परत मिळावी अशी माझी आणि अनेक साहित्यप्रेमींची प्रामाणिक भावना होती. अजुनही आहे. पण यावेळी तरी ते शक्य दिसत नाही.
४. प्रत्यक्ष चित्र निराशाजनक आहे! लाजिरवाणं आहे! मतांची लूट, बोगस मतदार नावे, परस्पर मतपत्रिका पळवून भलत्याच व्यक्तीने केलेलं बोगस मतदान, रजिस्टर होत असलेल्या पोलीस कंप्लेंट्स..वगैरे बघता केंद्रातला फाॅर्म्युला विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत देखिल पूर्ण ताकदीने राबवला जातो आहे, असं वाटते.
५. या निवडणुकीत उतरलेले अनेक चेहरे बघून आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. ते कुणाच्या सांगण्यावरून उतरले, कशासाठी उतरले, पुढचा काय गेम आहे, हेच कळत नाही. तथापि काही चांगली नावं आहेत, त्यांच्या पाठीशी किती लोक उभे राहतात, ते निकालानंतरच कळेल! (विशेष म्हणजे तेवढी समज आमच्यामध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे!)
६. विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते आणि डॉ. गिरीश गांधी यांच्यात फाईट आहे, असं ऐकण्यात येते. डॉ गिरीश गांधी हे साहीत्यीक नसले तरी त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. (केंद्रीय सत्ताही त्यांच्या बाजुने सक्रीय आहे!). दाते हे नाईट वाॅचमनसारखे अध्यक्षस्थानी आले आहेत. पण तेही तसे बऱ्यापैकी सर्वसमावेशक म्हणता येतील.
७. मात्र या निमित्ताने सर्वात जास्त घाट्यात गिरीश गांधी (उद्या निवडून आले तरी) हेच आहेत. ही खरंच त्यांची स्वतःची महत्वाकांक्षा आहे, की कुणाचं कारस्थान आहे? डॉ गांधी हे कुणाच्या उपवासाचा बकरा आहेत, की बळीचा बकरा, हे सांगता येत नसलं तरी, उद्घाटनापूर्विच पडणारे पुल बांधणारे गडकरी मात्र याबाबत काय ते सांगू शकतात! (मात्र, आपला अशा तर्हेनं उपयोग करू देण्याची पाळी कुणावरही येऊ नये, असं वाटते!)
८. त्या तुलनेत दाते यांची उमेदवारी कळत नकळत सोज्वळ वाटायला लागते. त्यामुळेच की काय, त्यांच्या बाजुनं तटस्थ लोकांची ताकद उभी राहताना दिसते आहे.
९. मात्र.. यातून आणखी एका संस्थेचा बट्ट्याबोळ होणार यात संशय नाही. तो कुणाच्या हातानं होणार आणि किती प्रमाणात होणार एवढाच काय तो प्रश्न आहे!
१०. अशा संस्था तरी राजकीय लोकांच्या हातात जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा आहे!
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान















