
नागपूर(Nagpur), दि. 16 मार्च 2026: विदर्भामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उष्णतेसोबतच आगीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने नागपूर आणि वर्धा(Wardha) जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीज यंत्रणेच्या आसपास कचरा टाकणे किंवा तो जाळणे ही केवळ तांत्रिक चूक नसून, तो संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेशी खेळ आहे, असे स्पष्ट करत महावितरणने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात अनेकदा वीजवाहिन्या, फिडर पिलर, रोहित्र (डीपी) किंवा वितरण पेट्यांजवळील मोकळ्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात ही वीज यंत्रणा आधीच प्रचंड तापलेली असते. अशा स्थितीत या कचऱ्याला आग लागल्यास किंवा तो मुद्दाम पेटवल्यास आगीच्या भीषण झळांमुळे भूमिगत केबल्स आणि महागडी उपकरणे पूर्णपणे जळून खाक होतात. यामुळे केवळ महावितरणचे आर्थिक नुकसान होत नाही, तर संबंधित संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा तासनतास खंडित होतो. विशेषतः डोक्यावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्याखालील कचरा पेटल्यास तारा वितळून खाली कोसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते.
विद्युत सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे. आपली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा एखाद्या निष्पापाचा बळी घेऊ शकतो किंवा संपूर्ण वस्तीला अंधारात टाकू शकतो. कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळून आपण आपली वीज यंत्रणा सुरक्षित ठेवू शकतो. नागरिकांनी स्वतः सतर्क राहून इतरांनाही वीज यंत्रणेजवळ आग लावण्यापासून रोखावे, हाच खरा सामाजिक सुरक्षेचा संदेश आहे.
बाहेरील यंत्रणेसोबतच घरगुती विद्युत उपकरणांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने वायरिंगवर ताण येतो. नॅशनल इलेक्ट्रिक कोडनुसार घराच्या वायरिंगचे आयुष्य 20 ते 25 वर्षे असते. त्यामुळे जुन्या इमारतींमधील वायरिंगची शासनमान्य परवानाधारक कंत्राटदाराकडून तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. वायरिंगमधील सैल जोडणी (Loose Connection), उंदरांनी कुरतडलेल्या वायर्स किंवा ओव्हरलोडिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो.
दुर्दैवाने आग लागल्यास घाबरून न जाता सर्वप्रथम घरातील ‘मेन स्विच’ बंद करावा. विद्युत आगीवर कधीही पाण्याचा वापर करू नका; त्याऐवजी कोरडी रेती किंवा कार्बन डायऑक्साइड (Fire Extinguisher) चा वापर करावा. आग लागल्याचे किंवा वीज यंत्रणेला धोका असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ महावितरणच्या 24 तास कार्यरत असलेल्या 1912, 19120 किंवा 18002123435 / 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
आपली सतर्कता आणि नियमांचे पालन हेच उन्हाळ्यातील आगीच्या संकटावर प्रभावी उत्तर आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर















