हिवाळी अधिवेशन : विधानसभा चारदा तहकूब
नागपूर. विधानसभेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने मागील सरकारच्या कामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विरोधकांनी गोंधळाला सुरूवात केली. विरोधकांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी सुरू केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’, ईडी सरकार हाय हाय’, “स्थगिती सरकार हाय हाय’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. गोंधळा दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर बोलायला संधी देतो असे सांगूनही विरोधकांचा गोंधळ सुरू होता. गोंधळातच प्रश्नोतरांचा तास सुरू करण्यात आला. प्रचंड गदारोळामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 11.30 वाजता पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर सलग 4 वेळा 10 ते 15 मिनीटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.
या गोंधळा दरम्यान काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार, अमीन पटेल यांनी मुंबईच्या रूग्णालयातील पदभरतीचा प्रश्न उपस्थित केला. यावरून विरोधकातील विरोधाभास दिसून आला. समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी शताब्दी हाॅस्पिटलचा प्रश्न उपस्थित केला. 11.30 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच तालिका सभापती समीर कुणावार यांनी पहिल्यांदा सभागृह 10 मिनिटांकरीता, दुसऱ्यांदा 15 मिनिटांसाठी आणि तिसऱ्यांदा परत 10 मिनिटांसाठी तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.
तालिका सभापतीनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर आसनस्थ झाले. त्या नंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार चालवित असताना विरोधी पक्षालाही मदत झाली पाहिजे. सरकार चालवित असताना भेदभाव व्हायला नको असे सांगितले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाले.
तत्पूर्वी गोंधळातच सत्ताधारी विरोधाकांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले गेले. सभागृहाने परवानगी दिलेल्या व्हाईट बुकमध्ये आलेल्या कामांनाही स्थगिती देण्यात आली. हे चांगले नाही असे अजित पवार यांनी सांगितले. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आमच्या सरकारची कामांना स्थगिती दिली. अडीच वर्षाच्या काळात भाजपाच्या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही. तुमच्याकडूनच आम्ही शिकलो असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर गोंधळात अधिकच भर पडली.