“‘हम तैयार नही’..हेच नागपूरने आज दाखवले..”: फडणवीस यांची टीका

0

(MUMBAI)मुंबई– “काँग्रेसच्या नागपुरात पार पडलेल्या रॅलीला महारॅली म्हणताच येणार नाही. ती सूक्ष्मरॅली होती. त्यात उपस्थिती कमी होती. राहुल गांधींचे भाषण सुरु होण्यापूर्वीच अनेक जण उठून जात होते. त्यांचे भाषण ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हते. एकप्रकारे नागपूर व विदर्भाने ‘हम तैयार नाही’, हेच काँग्रेसला दाखवून दिले”, असा टोला (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

काँग्रेसच्या नागपुरातील रॅलीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी काँग्रेसचा अनेक मुद्यांवर समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, काँग्रेसने एकतर छोट्या मैदानात सभा घेतली. तेलंगणातूनही लोक आणले होते. अर्धे मैदान रिकामे होते. त्यातील खुर्च्याही रिकाम्या होत्या. लोक जायला निघाले होते. राहुल गांधी यांना गांभीर्याने घ्यायला कोणीही तयार नाही, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. देशातील अनेक शूर राजे आणि राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपले स्वत्व टिकवून ठेवले. आज (Rahul Gandhi)राहुल गांधी सरसकट म्हणाले की देशातील राजा-महाराजांनी ब्रिटिशांशी साठगाठ केली होती. अशा प्रकारे राजघराण्यांचा अपमान करणे चुकीचे आहे. हे महाराष्ट्रात किंवा देशात कोणीही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.