
भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान निर्मित सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकार सहीत विविध राजकीय पक्षांची, इथल्या नागरिकांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इथल्या माध्यम जगताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असायला हवी. पण सद्यस्थितीत इथले राजकीय नेते आणि माध्यम जगतातले लोक ज्या बेजबाबदार पद्धतीने
वागत सुटले आहेत, ते बघितल्यानंतर आपल्याला युद्धाच्या परिस्थितीचे गांभीर्य कळते तरी का, असा प्रश्न उपस्थित होतो. एखाद्या देशाने दुसऱ्या देशाशी लढणे म्हणजे पोरखेळ नव्हे आणि गंमत तर, नव्हेच नव्हे! सैनिकांच्या जीवावर ही परिस्थिती हाताळायची असते.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने एक निर्णायक भूमिका स्वीकारली आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर थेट हल्ला केला. ती केंद्रे भारताच्या ड्रोन हल्ल्यात नेस्तनाबूत झालीत. शंभरावर दहशतवादी मारले गेले. आणि त्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल भारतावर द्रोण हल्ल्यांचे सत्र सुरू झाले. आता तर तो देश मिसाईल हल्ले करण्यापर्यंतच्या नीच पातळीवर उतरला आहे. या परिस्थितीत सर्वच्या सर्व ड्रोन हल्ले निरस्त करण्याइतकी सक्षम आणि आधुनिक यंत्रणा भारताकडे आहे, आणि त्याचा उपयोगही भारत यशस्वीपणे करत आहे, हे खरं असलं, तरी ज्या पद्धतीच्या आणि ज्या पद्धतीने माध्यम जगतातून बातम्या पसरवल्या जात आहेत, ते बघितल्यानंतर या क्षेत्रातील लोकांनी जबाबदारीचे भान खुंटीवर टांगून ठेवले आहे की काय, असेच वाटते.
भारताने पाकिस्तानातल्या विविध शहरांवर हल्ला केल्याच्या, त्या देशाची राजधानी ताब्यात घेतल्याच्या, तिथली विमानतळं बाॅम्बने उडवल्याच्या, तिथल्या सेनाप्रमुखाला शिक्षा झाली असल्याच्या, अनेकानेक बातम्या अशा आहेत की, ज्या केवळ कपोकल्पित आणि निराधार देखील आहेत. अनेक बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेल्या मिसाईलच्या किंवा ड्रोन हल्ल्यांच्या व्हीडिओ क्लिप्स तर इज्रायल आणि गाझा या दोन देशांमधील युद्धादरम्यानच्या असल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्या युद्धातील दृश्य, ज्याचा आताच्या घटनेशी काडीचा संबंध नाही, ती आता आपल्या देशाच्या संदर्भात दाखवण्याचा प्रताप फक्त बेजबाबदार लोकच करू शकतात. अशा पद्धतीने बातम्या पेरून, माध्यम जगतातील हुशार मंडळी नेमकं काय मिळवत आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक अनेक टीव्ही चॅनेल्सवर तर एस-४०० ही, ड्रोनचे हल्ले निरस्त करणारी, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी यंत्रणा, नेमकी कशी काम करते, हे तज्ज्ञांच्या सहाय्याने समजावून सांगण्याचा प्रकार सुरू आहे. काही माजी सैनिकी अधिकाऱ्यांना बोलते करून, ही यंत्रणा कशी काम करते, हे मुद्देनिहाय समजावून सांगण्याचा आणि त्यातून आपण काहीतरी जगावेगळी माहिती लोकांसमोर सादर करीत असल्याच्या अविर्भावात वागण्याचा प्रकार देखील अनाकलनीय आहे. युद्धात वापरली जाणारी एखादी यंत्रणा शत्रूच्या विरोधात नेमकी कशी काम करते हे सर्वसामान्य जनतेला समजावून सांगण्याची ही वेळ आहे का? जी यंत्रणा आपण सध्या पाकिस्तानच्या विरोधात वापरतो आहोत, तिच्या कामाची पद्धत टीव्हीवरून जाहीरपणे सांगण्याचा पाकिस्तानला उपयोग होणार नाही याची खात्री ही माहिती सादर करणाऱ्या माध्यमांना देता येईल का? आणि ती खात्री देता येत नसेल, तर मग अशा गंभीर युद्धजन्य परिस्थितीत ही माहिती जगजाहीर करण्याची अक्कल कुणाला कशी सुचते? जबाबदारपणे वागायचं नाहीच असं या क्षेत्रातील या मंडळींनी ठरवलं आहे का, असेच आता वाटू लागले आहे. सध्या रील्सच्या जगात तर खेळण्यातले ड्रोन्स आणि मिसाइल्स वापरून पाकिस्तानच्या विरोधात भारतीय सैन्य कसे दमदार काम करत आहेत, हे दाखवण्याचे प्रकार चालले आहेत. पोरखेळ चालला आहे नुसता…
यातील एकावरही विश्वास ठेवू नये अशाच बातम्यांची पेरणी सध्या जवळपास सगळ्याच खाजगी वृत्तवाहिन्यांनी चालवली आहे. सबसे तेज आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली लोकांना घाबरवण्याचा प्रकार देखील समजण्यापलीकडचा आहे. पाकिस्तानने भारतावर मारा करण्यासाठी धाडलेले ड्रोन आकाशात निरस्त केले, तरी त्या ड्रोनचे तुकडे खाली जमिनीवरच पडणार, हे स्वाभाविक आहे. पण, त्या पडलेल्या तुकड्यांचे चित्रीकरण आणि आपण खूप काहीतरी जगावेगळे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, अशा थाटातली त्या तुकड्यांची बातमी असो किंवा मग काश्मिरात बातमीदारी करायला गेलेल्या एखाद्या टीव्ही पत्रकाराने, सुरक्षेच्या कारणावरून मी माझे सध्याचे लोकेशन तुम्हाला सांगणार नाही, पण सध्या पुंछमध्ये सगळीकडे ब्लॅकआऊट करण्यात आले आहे, अशी माहिती नंतरच्या वाक्यात सांगणे म्हणजे, या लोकांनी सध्या अकलेचा नुसता बाजार मांडला असल्याचेच द्योतक आहे.
आपला देश दुसऱ्या एका देशाशी सीमेवरचे युद्ध लढतो आहे. अशा स्थितीत बातमीदारी करताना किती काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागलं पाहिजे, हे जर या देशातल्या माध्यम जगताला कळत नसेल, तर यासारखी लाजिरवाणी बाब दुसरी नाही. हे युद्ध जरी दोन देशातले असले, तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत असतात. रशिया अमेरिकेसारख्या दुनियेवर दादागिरी करणाऱ्या देशांचीही भूमिका त्यात असते. अशा स्थितीत भारताने इस्लामाबादवर ताबा मिळवला असल्याची खोटी बातमी जागतिक राजकारणात काय परिणाम घडवून आणू शकते, एवढी साधी गोष्ट जर पत्रकार म्हणवणाऱ्या घटकांना कळत नसेल, तर देवच आपल्याला वाचवू शकतो!
युद्धाच्या परिस्थितीत कसे वागले पाहिजे, याचा सारासार विचार होण्याची आता गरज आहे. सरकारने या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याची वेळ येणे, हा मध्यम जगताच्या अकलेची लक्तरं निघाली असल्याचे सांगणारा प्रसंग आहे. सायरन चा आवाज ऐका, बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐका, एखाद्या भिंतीला पडलेले भगदाड बघा असे म्हणत लोकांना अफलातून बातमी आपण देत असल्याचा देखावा करण्यापेक्षा, केवळ आणि केवळ आपल्या सरकारने जाहीर केलेली अधिकृत माहितीच या क्षणी जनतेला देण्याची जबाबदारी माध्यमांनी पार पाडावी, असे त्यांना निक्षून सांगण्याची वेळ आता आली आहे.
या देशातल्या राजकीय नेत्यांना तर शहाणपण कोणी शिकवावे हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताने पाकिस्तानात दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचे पुरावे मागणारे राजकीय नेते, तर थोबाडीत हाणण्याच्या लायकीचे आहेत. राजकारण कुठल्या कुठल्या प्रसंगी करावे एवढे जर त्यांना कळत नसेल, तर पार्श्वभागावर लाथ मारून त्यांनाही तळ्यावर आणले पाहिजे. एकूण काय, तर राजकारणापासून तर माध्यम जगतापर्यंतचे सारेच लोक अपेक्षित नसलेल्या वर्तनाचे प्रदर्शन मांडत सुटले आहेत. सध्या जबाबदार फक्त सरकार आहे आणि बाकीच्यांनी, आपल्याला फक्त बेजबाबदारपणे वागायचे असल्याचा गैरसमज करून घेतलेला दिसतो. अन्यथा युद्धाच्या प्रसंगी उपयोग होईल म्हणून भारत सरकारने अटारी बॉर्डरच्या परिसरातील गावांसाठी साठवण्याकरता
धान्य मागवले आहे, याची बातमी एखादा टुकार पत्रकारच करू शकतो. दुसरीकडे, समाज माध्यमांवर काही नागरिकांचेही बेजबाबदार वागणे चालले आहे. सद्यस्थितीत सरकारला नावे ठेवावीत असे कुठलेही चित्र नाही. या प्रकरणात युद्धाची परिस्थिती भारताने निर्माण केलेली नाही. या पार्श्वभूमीवर, सरकारला काही दोष द्यायचेच असतील तर ते युद्धाची परिस्थिती निवळल्यावर द्या. आता, या क्षणी फक्त सरकारच्या बाजुने उभे राहण्याचे तारतम्य तेवढे बाळगा.
भारत पाकिस्तान दरम्यान झालेच युद्ध, तर या युद्धाचा निकाल भारताच्या बाजूने लागेल याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही पण, त्यानंतरही इथल्या बेजबाबदार लोकांना अक्कल कधी येईल, हा प्रश्न मात्र तेव्हाही अनुत्तरीतच राहणार आहे….
सुनील कुहीकर
संपादक, शंखनाद