काजवा कधी सूर्य होऊ शकत नाही!

0

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. घेतलेली शपथ त्यांनी आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांच्या राजवटीत तळपणारा शौर्याचा तेजस्वी तारा होय. त्यांनी आपल्या शौर्याच्या तेजाने इस्लामिक राजवटीला होरपळून टाकले. स्वतःची युद्धनीती त्यांनी अस्तित्वात आणली, राबवली आणि जगप्रसिद्ध केली. नवे नवे युद्धतंत्र वापरून त्यांनी जगाच्या युद्धशास्त्रात आपला स्वतःचा ठसा उमटवला. आणि युद्धशास्त्र अधिक प्रगल्भ केले. म्हणूनच त्यांची युद्धनीती जगात अव्वल दर्जाची ठरवली. जगातल्या अनेक रणधुरंधरांनी शिवरायांचे अनुयायी होण्यात धन्यता मानली.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे असा कोणता वकूब आहे की त्यांची तुलना छत्रपती शिवरायांची करावी! छत्रपती शिवराय निर्व्यसनी होते. राहुल गांधी तळीराम आहेत. छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला स्पर्शही केला नाही. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कशाप्रकारे वावरतात त्याची छायाचित्रे आणि चित्रफिती सर्वत्र प्रसारित झाली आहेत. अशा अत्यंत सामान्य व्यक्तीची तुलना छत्रपती शिवरायांसारख्या स्वराज्य संस्थापकाशी करणे म्हणजे शिवरायांचा केलेला हा अपमान आहे. राहुल गांधींकडे कोणत्याही प्रकारचे शौर्य नाही. तेजस्वी बुद्धीचा अभाव आहे. शिवरायांच्या तेजस्विते पुढे राहुल गांधी एखाद्या काजव्याच्या तुलनेचे आहेत असे सुद्धा म्हणता येत नाही.

शिवरायांनी कधीही असत्य भाषण केले नाही. ते आपल्या निश्चयापासून कधीही ढळले नाहीत. कोणत्याही ऐतिहासिक पुरुषांचा त्यांच्याकडून अवमान झाला नाही. राहुल गांधी तर अनेक ऐतिहासिक पुरुषांचा अवमान करण्यासाठी जन्माला आले आहेत की काय असे वाटावे असे त्यांचे आचार आणि विचार आहेत.

छत्रपती शिवरायांची वाणी गंगेप्रमाणे पवित्र आणि शुद्ध होती. राहुल गांधींना अनेक शब्दांचा स्पष्ट उच्चार करता येत नाही. संस्कृत भाषेचा तर त्यांना गंधही नाही. शिवराय संस्कृत भाषेतही प्रवीण होते. शिवरायांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांचे परिशिलन केले. श्री राम आणि श्रीकृष्ण यांना आदर्श मानून त्यांनी राज्यकारभार केला. शिवरायांची राष्ट्रभक्ती शिवरायांची स्वामीनिष्ठा शिवराज्यांची संस्कृतीनिष्ठा धर्मनिष्ठा ध्रुवताऱ्याप्रमाणे आढळ होती. राष्ट्रभक्ती स्वामिनिष्ठा संस्कृतीनिष्ठा धर्मनिष्ठा या गोष्टींशी राहुल गांधींची दूर दूर पर्यंतचाही संबंध नाही. श्री राम आणि श्रीकृष्ण चरित्राचा साधा परिचय सुद्धा राहुल गांधींना नाही. म्हणूनच तेजस्वी ताऱ्याशी काजव्याचा संबंध जोडणारी व्यक्ती सुद्धा अत्यंत सुमार बुद्धिमत्तेची आहे यात वाद नाही.

अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची तोडलेली बोटे या आणि अशा शिवरायांच्या चरित्रातील असंख्य महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या सर्वोत्कृष्ट युद्धनीतीची साक्ष देणारी आहे. शिवरायांनी एकदा वापरलेले डावपेच दुसऱ्यांदा कधीही वापरले नाहीत. प्रत्येक वेळी नवे डावपेच वापरून महाबलाढ्य अशा औरंगजेबाला सुद्धा जेरीस आणले.

साध्या लोकशाही निवडणुकीत स्वतःचा राजकीय पक्ष जिंकून येण्यासाठी कोणताही प्रभावी डावपेच राहूल गांधींच्या बुद्धीची तेजस्विता प्रकट करू शकली नाही. अशा अत्यंत निम्नातील निम्नस्तरावर असणाऱ्या राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवरायांसारखे तेजस्वी पुरुषाबरोबर करावी असे कोणाला वाटत असेल तर त्याच्या बुद्धीचे दिवाळी वाजले आहे असे निश्चित समजावे. तसेच अत्यंत सुमार माणसाच्या गळ्यात कोहिनूर हिऱ्यांची माळ घातल्यासारखे आहे.

छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या हालचाली आणि शत्रूचे डावपेच ओळखून पूर्वतयारी केली आणि शत्रूवर मात करून आपला धाक शत्रूवर बसवला. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज यांचे स्वतःचे आरमार दल होते. त्या बलाढ्य आरमाराशी सामना करू शकणारे आणि त्यांच्यावर आपले वर्चस्व आणि वचक प्रस्थापित करणारे बलाढ्य आरमारदल अल्पावधीत निर्माण करणारा हिंदूंचा राजा म्हणून छत्रपती शिवरायांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.

राहुल गांधींनी असा वचक आपल्या नजीकच्या लोकांवर तरी बसवला आहे का?

कोंबड्याला मोर, कावळ्याला राजहंस, गांडूळाला गरूड, राईला मेरुपर्वत म्हणणारा गोतावळा सभोवती असेल तर अशा लोकांनी राहुल गांधींच्या पौरुषत्वाचे गुणगान कितीही गायले तरी त्याला शिवरायांसारख्या तेजस्वी सूर्याशी बरोबरी करता येणार नाही.

हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे शिवराय, हिंदुत्व आणि हिंदुधर्माला कस्पटासमान लेखणारे राहुल गांधी यांची तुलना कशी करता येईल? निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी अशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांसाठी वापरलेली विशेषणे राहुल गांधींना कदापी लावता येणार नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधीजींचे पणजोबा नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू असे संबोधन वापरले. त्या परिवारातल्या राहुल गांधींची तुलाना शिवरायांशी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. एवढेच नाही तर शिवरायांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी शिवरायांच्या नंतरच्या काळातल्या ज्या शूरवीर मावळ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले त्यांचाही तो अपमान आहे. त्यांच्या पराक्रमामुळे वायव्य सरहद्दी कडून अनेक शतके हिंदुस्थानवर आक्रमण झाले नाही.

वैदिक काळातील हिंदूंची भूमी पूर्णपणे स्वतंत्र करून भगव्या ध्वजाखाली आणणे म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे होय! हा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्या संस्कारांनी प्रेरित झालेले मावळे हिंदुस्तानचे नेतृत्व करत होते. शिवरायांची विजयाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्राणाची बाजी लावली ती या वीर मावळ्यांनी. या ऐतिहासिक वीर परंपरेचा अपमान करून अखंड हिंदुस्तानला खंडित करणारा पहिला पंतप्रधान राहुल गांधींचा पणजोबा आहे. शिवरायांच्या स्वप्नाचा भंग करणाऱ्या कुळात जन्माला आलेल्या राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून आज पर्यंत झालेल्या सर्व शूरवीर सम्राटांचा आणि त्यांच्या विजयी परंपरेचा अपमान करण्यात आला आहे. अशा अपराधासाठी राहुल गांधी आणि त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे हीच या देशातल्या तमाम हिंदू जनतेची मागणी आहे.

– दुर्गेश जयवंत परुळकर

९८३३१०६८१२