Home Artical Blog महावितरणचा थकबाकीदारांना ‘हाय व्होल्टेज’ शॉक

महावितरणचा थकबाकीदारांना ‘हाय व्होल्टेज’ शॉक

0

नागपूर(Nagpur), दि. २९ मार्च २०२६: आर्थिक वर्षाचे शेवटचे अवघे काही तास उरले असताना महावितरणने थकबाकी वसुलीसाठी आतापर्यंतची सर्वात कठोर भूमिका घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 43 कोटी रुपयांचा डोंगर उभा राहिल्याने प्रशासनाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, आता चक्क पोलीस बंदोबस्तात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडाकेबाज मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत 1 मार्च पासून आतापर्यंत 36 हजाराच्या वर थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ‘बिलाचा भरणा करा अन्यथा अंधारात राहा’ असा थेट इशारा देत महावितरणने नागपूरसह जिल्ह्याभरात वसुलीचा ‘धडाका’ लावला आहे.

संवेदनशील भागात ‘खाकी’च्या पाहेऱ्यात कारवाई: थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि वाढता विरोध लक्षात घेता, महावितरणने आता पोलीस प्रशासनाचे कवच घेतले आहे. नागपूर शहरातील लष्करीबाग उपविभागांतर्गत येणाऱ्या मानकापूर आणि नई बस्ती यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये आज पोलीस फौजफाट्यासह महावितरणचे पथक धडकले. कोणत्याही दबावाला बळी न पडता, ज्या ग्राहकांनी वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली नाही, अशा शेकडो ग्राहकांचा वीज पुरवठा जागीच खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे, या मोहिमेत राजकीय मध्यस्थी किंवा सामाजिक दबाव झुगारून लावत केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काटोलमध्ये कर्मचाऱ्यांवर हल्ला; आरोपींवर गुन्हा दाखल: वसुली मोहिमेदरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्धही महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काटोल शहरातील पेठ बुधवार भागात थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर काही इसमांनी हल्ला चढवून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘अल्टिमेटम’: केवळ सामान्य ग्राहकच नव्हे, तर सरकारी यंत्रणांकडेही महावितरणने आपला मोर्चा वळवला आहे. नागपूर जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची तब्बल 10 कोटींची थकबाकी थकली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून नगरपंचायत, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) भेटी घेतल्या आहेत. “सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचा पुरवठा खंडित झाल्यास त्याला सर्वस्वी स्थानिक प्रशासन जबाबदार राहील,” अशा शब्दांत महावितरणने ही ‘अंतिम संधी’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

अंतिम 48 तास; सुटीच्या दिवशीही केंद्रे खुली: चालू आर्थिक वर्षाचा मंगळवार शेवटचा दिवस आहे. आणि मंगळवारी सुटी असली तरी ग्राहकांची सोय व्हावी आणि त्यांना कारवाईपासून वाचता यावे, यासाठी महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. याशिवाय, ग्राहकांनी महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळावरून ऑनलाईन भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन नागपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.

पुढील दोन दिवस ही मोहीम अधिक तीव्र होणार असून, थकबाकीमुक्त न होणाऱ्या भागांत अंधार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर.