
नागपूर(Nagpur), 21 फेब्रुवारी 2026: सर्वसामान्य आणि प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणने कंबर कसली आहे. खापरखेडा उपविभागा अंतर्गत महादुला येथील नुर नगर भागात गावात शुक्रवारी पहाटे 5:50 वाजता महावितरणच्या पथकाने या भागात धडक देत संशयास्पद 11 ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी केली. या धडक मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत एकूण 11 संशयास्पद विद्युत जोडण्यांची तपासणी करण्यात आली. ज्यात 4 ग्राहकांना प्रत्यक्ष वीज चोरी करताना रंगेहात पकडले. या ग्राहकांनी इनकमर वाहीनीला थेट जोडून वीज पुरवठा घेतल्याचे या धडक कारवाईच्या वेळि आढलले. या ग्राहकांवर वीज कायदा 2003 (सुधारित 2007) च्या कलम 135 अन्वये सुमारे 2 लाख 57 हजार 570 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले या ग्राहकांवर वीजचोरीच्या मुल्यांकनासोबतच तडजोडीपोटी 22 हजार रुपयाचा दंड देखील आकारण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेत उपविभागीय अभियंता मंगेश कहाळे, सहाय्यक अभियंता रुपेश खवसे, प्रधान तंत्रज्ञ सुरेश अतकरे, वरिष्ठ तंत्रज्ञ त्रिनेत्र ढोणे सहभागी झाले होते.

वीज चोरीमुळे वितरण प्रणालीवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना कमी व्होल्टेज किंवा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागतो. ही मोहीम केवळ दंडात्मक नसून, प्रत्येक ग्राहकाला हक्काची आणि सुरक्षित वीज मिळावी यासाठीचे एक सकारात्मक पाऊल आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, ग्रामीण भागात विजेची गळती रोखण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही सातत्याने राबवल्या जातील.

वीज चोरी हा केवळ गुन्हा नसून तो सुरक्षिततेसाठीही धोकादायक आहे. नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, जेणेकरून अपघात टाळता येतील आणि अखंडित सेवा देता येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर














