देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आगामी वर्ष अत्यंत आव्हानात्मक-रघुराम राजन यांचा इशारा

0

नवी दिल्ली: आगामी वर्ष केवळ भारतासाठीच नव्हे तर साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी दिला आहे. (Raghuram Rajan On Indian Economy) देशातील निम्न मध्यमवर्गाला केंद्रीत करून काही धोरणे आखणे गरजेचे असल्याचा सल्लाही राजन यांनी दिला आहे. अलिकडेच रघुराम राजन हे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहबागी झाल्याने चर्चेत आले होते. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना राजन यांनी देशातील आर्थिक आव्हानांचा उवापोह केल्याचे सूत्रांनी सांगिले.
भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना राजन यांनी म्हटले आहे की, आगामी वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. जगभरात विकासाची गती मंदावली आहे. भारतावरही याचा परिणाम होणार आहे. भारताची निर्यात थोडी कमी झाली आहे. भारताच्या विकासात महागाई देखील अडथळा ठरत आहे. बेरोजगारी वाढत असून आता खासगी क्षेत्राने नोकऱ्यांसाठी पुढे यावे, असे आवाहन राजन यांनी केले. सरकारी नोकरी साऱ्यांना मिळू शकत नाही. मात्र, तंत्रज्ञानाचा योग्य वापरातून कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, असेही राजन यांनी म्हटले आहे.
निम्न मध्यम वर्ग
कोरोना महासाथीच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे उच्च मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले. श्रीमंतांना कोणतीही आर्थिक अडचण जाणवली नाही. गरीब वर्गाला रेशन आणि इतर गोष्टींची मदत मिळाली. पण, निम्न मध्यमवर्गाचे मोठे नुकसान झाले. नोकऱ्या नसल्याने बेरोजगारी वाढली कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. आर्थिक असमानता वाढली असल्याचे दिसून आले. या वर्गाला विशेष लक्षात घेऊन धोरण आखणे गरजेचे आहे, असेही राजन यांनी सुचविले आहे.