श्रद्धावर तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव नव्हता-उपमुख्यमंत्री फडणवीस

0

लव्ह जिहाद रोखण्यासाठी इतर राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास सुरु


नागपूर : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाचा (Shraddha Walker Murder Case) विषय मंगळवारी विधानसभेत उपस्थित झाला. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदे करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे असल्याचे सांगताना श्रद्धाने तुळींज-नालासोपारा पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात कोणताही राजकीय दबाव असल्याचे दिसले नाही, असा विधानसभेत स्पष्ट केले. .Maharashtra Assembly Winter Session 2022 आंतरजातीय, आंतरधार्मिय विवाहांना आमचा अजिबात विरोध नाही, असे स्पष्ट करून लव्ह जिहाद सारखे प्रकार रोखण्यासाठी इतर राज्यांनी नेमके काय कायदे केलेत, याचा सरकार अभ्यास करीत असून गरज पडल्यास सध्याच्या कायद्यात सुधारणा किंवा नवा कायदा देखील करता येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी आज दिली.


आमदार अतुल भातखळकर, सुनील प्रभू यांच्यासह अनेक सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा विषय मांडला होता. श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली, त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव राजकीय होता का, असा प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला. श्रद्धाने तक्रार मागे घेण्याबाबत त्यावेळीचा सरकारमधील प्रमुखांचा दबाव होता का? असाही प्रश्न भातखळकरांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तिच्या वडिलांची माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला. या प्रकरणात राजकीय दबाव आढळून आलेला नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, श्रद्धाने तक्रार दिली आणि एक महिन्यानंतर अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एका महिन्यात पोलिसांनी काय करवाई केली, याची चौकशी करीत आहोत. आम्ही पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखली समिती नेमली असल्याचे त्यांनी सांगितले. श्रद्धा वालकरच्या सेटलमेंटच्या पत्रावर खाडाखोड असल्याचा मुद्दा आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केला. त्यावर एक विशेष पथक तयार करुन चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. शक्ती कायद्याला उशीर का होत आहे, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. श्रद्धा प्रकरणी तुम्ही थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही पवार म्हणाले. लव्ह जिहाद हे नाव केरळ पोलिसांनी दिले असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, हे आपल्याला मान्य करावे लागणार असून पण गेल्या काही काळात षड्यंत्र करून विवाह होत आहेत. वर्षभरात मुलीला त्रास दिला जातो. त्यामुळेच काय कायदा करता येऊ शकेल, याचा अभ्यास सरकार करत आहे. कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, लव्ह जिहादच्या नावाखाली एका धर्माची बदनामी केली जात आहे. श्रद्धा वालकर हे लव्ह जिहाद प्रकरण नसून लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय आहे, असा दावा आमदार अबू आझमी यांनी केला.