
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आमदार निलेश लंके यांनी जाहीरपणे बोलून दाखविली असून त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याबद्धल आज नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता पवारांनी त्यावर अतिशय स्पष्ट उत्तर (NCP President Sharad Pawar) दिले.
शरद पवार म्हणाले की, “अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे संख्याबळ नाही. ती असती तर सहकारी पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता. संख्याबळ नसल्याने ते शक्य नाही. आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही.”
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले की, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काहीच हरकत नाही. पण, ते येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एक वर्ष झाले असल्याने आता त्यावर चर्चा करून काहीच उपयोग नाही, असे पवारांनी नमूद केले. पटोलेंनी राजीनामा देताना सगळ्यांना विश्वासात घेतले नाही, एवढीच व्यथा आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण तुरुंगात डांबले गेले,असे ही पवार म्हणाले. पवार म्हणाले, नवाब मलीक आजही जेलमध्ये आहेत. राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता भाजपने त्यांच्या भूमिकेचा विचार करावा, असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली असते. मात्र काही दिवसांपासून ज्या पद्धतीने हल्ले किंवा गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे, त्यावरून कायदा व्यवस्था बिघडत चालली आहे, असा आरोप पवारांनी केला.