
राजीव गांधी इंजिनियरिंग महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
चंद्रपूर(Chandrapur): छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण राज्यकारभारासोबतच अभियांत्रिकी क्षेत्रातही देशासमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक पराग धनकर यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेले गडकिल्ले, विकसित केलेली सिंचन व्यवस्था, बळकट आरमार आणि पर्यावरण संवर्धनाची भूमिका ही उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याची ज्वलंत उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.
Sardar Patel Memorial Trust, चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी इंजिनियरिंग महाविद्यालय, चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिंताडे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
प्रा. धनकर पुढे म्हणाले की, शिवकालीन गडकिल्ल्यांची रचना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली होती. डोंगरमाथ्यांवरील किल्ल्यांची बांधणी, पाण्याची साठवण व्यवस्था आणि संरक्षणात्मक बुरुज यामध्ये अत्यंत सूक्ष्म नियोजन दिसून येते. तसेच शेतीस पूरक ठरेल अशी सिंचन व्यवस्था उभारून महाराजांनी शाश्वत विकासाचा आदर्श घालून दिला.
आरमार उभारणीद्वारे समुद्री सुरक्षेला बळकटी देताना त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला. किनारपट्टीवरील किल्ले आणि नौदलाची रणनीती ही त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी व लष्करी दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने किल्ल्यांभोवतीची नैसर्गिक रचना जपण्यावर त्यांनी भर दिला, हेही विशेष उल्लेखनीय असल्याचे प्रा. धनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शौर्य, पराक्रम, न्यायप्रियता आणि रयतेप्रती असलेल्या कर्तव्यभावनेवर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. डॉ. धनंजय डुंबेरे यांनी केले.















