चंद्रपुरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण पूर्ण

0

४ हजार ९०९ घरे बंद तर
४८८ कुटुंबियांचा माहीती देण्यास नकार

चंद्रपूर ४ फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी हाती घेतलेले सर्वेक्षण हे १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून ४८८ कुटुंबियांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर शहरातील २३ फेब्रुवारी २०२४ पासून मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण नुकतेच दिनांक २ फेब्रुवारीला पूर्ण झाले. चंद्रपूर शहरातील ८० हजार ९५१ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ८७४ कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठून ३ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपूर मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या मास्टर ट्रेनरने महानगरपालिकेतील नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण दिले होते. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ प्रश्न विचारण्यात आले असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. सदर माहिती मुलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याचे समजल्यानंतर प्रगणकाने त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली नाही.

ही कार्यवाही आयुक्त विपीन पालीवाल व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात करण्यात आली. दरम्यान, ३१ जानेवारी पर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. जी घरे बंद होती त्यांना कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट दिली होती. मात्र त्यातील काही घरे बंदच असलेली आढळली. त्याचप्रमाणे सर्वेक्षणास नकार देणाऱ्या कुटुंबांची कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.सर्वेक्षण दरम्यान काही नागरिकांमध्ये या सर्वेक्षणाबाबत भीती व शंका – कुशंका असल्याचे जाणवले.

नाश्त्यात झटपट बनवा बाजरीची लापशी | Shankhnaad News #shankhnaadnews #live