Chandrapur – दासाहेबांचे कार्य प्रत्येक पिढीसाठी आदर्श आहे. त्यांना सन्मानित करणे, त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आणि कार्य हे आमच्या समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत. दादासाहेबांचे कार्य, त्यांची प्रेरणा आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गौरव ग्रंथ प्रकाशित करावा, यासाठी अध्यक्ष महोदयांना विनंती करेन, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा.सा. कन्नमवार यांची आज 125वी जयंती आहे. या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शतकोत्तर आणि रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Devendra Fadanvis)
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.
कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा
तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना व रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयेाजित कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयोजन समितीचे राहुल कन्नमवार, सुर्यकांत खनके आदी उपस्थित होते.
लोकनेते दादासाहेब कन्नमवारांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले, याचा अतिशय आनंद आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दादासाहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. भारत – चीन युध्दाच्या वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.सा. कन्नमवार यांनी राज्याची सुत्रे सांभाळली. या पदावर ते 1 वर्ष 4 महिने होते. युध्दाचा तो काळ होता. अशा परिस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी दादासाहेबांनी जनतेला आवाहन केले. त्याकाळात चंद्रपूर जिल्ह्याने तसेच महाराष्ट्राने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशासाठी सोने-नाणे, आर्थिक मदत दान केली.
शिक्षण आणि आरोग्य हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असावे, असा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादासाहेबांनी मांडला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. या राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय मोठे योगदान दादासाहेबांनी दिले आहे. विधानसभेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येईल.
पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांचा विकास करणे, हेच आपल्या सरकारचे सुध्दा ध्येय आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडविण्यात येईल. तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यासुध्दा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मा.सा. कन्नमवार यांच्याकडे विकासाची दृष्टी : सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या मा.सा. कन्नमवार यांनी आपल्या कर्तृत्वाने शिखर गाठले. कर्मवीर दादासाहेबांना विकासाची दृष्टी होती. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याने दिले आहे. अनेक बाबतीत दादासाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात साम्य असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच समृध्दी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
तसेच चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कॅन्सर रुग्णालयाकरीता 100 कोटींची आवश्यकता असून राज्य शासनाने सदर निधी द्यावा. जिल्ह्यातील धानोरा बॅरेज पूर्ण करावा. कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर जाहीर करावी. तसेच चंद्रपूरात 400 एकरवर 287 कोटी रुपये खर्च करून होत असलेला टायगर सफारी प्रकल्प मार्गी लावावा, अशा मागण्यासुध्दा आमदार श्री. जोरगेवार यांनी केल्या.
अध्यक्षीय भाषणात आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, विहिरी आणि घरे बांधणा-या कष्टकरी समाजातून आलेले दादासाहेब हे राज्याच्या सर्वोच्च पदी पोहचले. चंद्रपूर आणि गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात त्यांनी अनेक विकासकामांची पायाभरणी केली. चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव द्यावे तसेच अल्प असलेल्या या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील डॉ. गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन : चंद्रपूर दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेतले व मंदिरात महाआरती केली. मंदिर विकासासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ठरविल्याप्रमाणे निश्चितपणे मंदिर परिसराच्या विकासाचे चांगले काम याठिकाणी होईल. तसेच पाठपुरावा करून मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम करण्यात येईल.
०००००००
फडणवीस म्हणाले, आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवर प्रत्येक व्यक्तीला योगदान द्यायचं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कार्य करावं. माझ्या दृष्टीने, दादासाहेबांचा आदर्श आणि कार्य प्रत्येकाने आत्मसात करावा, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला राज्याचा विकास सुनिश्चित करावा.
महाराष्ट्र निर्मितीवर बोलताना फडणवीस म्हणाले, पंडित नेहरूजींनी त्या काळात म्हटलं होतं की, “मुंबई जर महाराष्ट्राला मिळायची असेल, तर सर्व मराठी भाषिकांचे एक राज्य असावे. अन्यथा, मुंबई गुजरातला जाईल.” आणि यावर विदर्भातील नेत्यांनी, विशेषत: यशवंतराव चव्हाण यांनी तीव्र भूमिका घेतली होती की, “जर मराठी भाषिक एकत्र आले नाहीत, तर मुंबई, जी महाराष्ट्राची आहे आणि मराठी माणसाची आहे, ती गुजरातला जाईल.” म्हणून, तेव्हा एकत्र येणे आवश्यक होतं, आणि यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांना एकत्र करून महाराष्ट्र एकत्र केला.
संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर, त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील अनेक लोकांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. दादासाहेब कदमबारांनी त्यावेळी महत्त्वाची भूमिका घेतली, आणि सांगितलं की, “आता वेळ वेगळ्या दिशेने जाण्याची नाही, आपल्याला एकजूट राहून महाराष्ट्र पुढे नेण्याची आवश्यकता आहे.” यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास झाला आणि त्यांनी देशाच्या सेवेत आपला मोठा वाटा उचलला. युद्धाच्या काळात, देशाला पैसे आणि शस्त्रांची आवश्यकता होती. दादासाहेबांनी महाराष्ट्राच्या लोकांना आवाहन करून पैसा जमा करण्याची मागणी केली, आणि महाराष्ट्राने त्या काळात देशाच्या मदतीसाठी सर्वाधिक 7 कोटी रुपये दिले. हा इतिहास आम्ही सर्वांनी जवळून पाहिला आहे.
दादासाहेबांची विचारधारा आणि कार्य खूप महत्त्वाचे होते. त्यांचे कार्य शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी होतं. त्यांनी जिल्हा आरोग्य केंद्रे आणि दवाखाने सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यांचं लक्ष शिक्षण आणि आरोग्य सेवांवर केंद्रित होतं, आणि त्यांनी विदर्भात शिक्षणाची जागरूकता वाढवली, असा गौरव त्यांनी केला.
दादासाहेबांचे जीवन आपल्याला मार्गदर्शन करतं. ते मुख्यमंत्री असताना, त्यांचे निधन झालं, पण त्यांची भूमिका आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नागपुरात झाला, आणि त्यावेळी त्यांच्या पत्नी एसटीच्या तिकिटाच्या रांगेत उभ्या होत्या. हे त्यांच्या साध्या जीवनाचा आणि कष्टाची प्रेरणा देणारं उदाहरण आहे, असंही ते म्हणाले.