गडचिरोली : पोलिस चकमकीत 4 नक्षलवादी ठार

0

रेपनपल्लीच्या जंगलात सी-सी-60 जवानांनी घातले कंठस्नान

गडचिरोली,(Gadchiroli) 19 मार्च : तेलंगणातून गडचिरोलीत दाखल झालेले नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज, मंगळवारी 19 मार्च रोजी पहाटे छत्तीसगड सीमेवरील कोलामार्का जंगलात जोरदार चकमक उडाली. यात 4 नक्षलवादी ठार झालेत. यामध्ये नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य वर्गेश, मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचा सचिव कुमुराम भीम, मंचेरियल विभागीय समिती सदस्य मगटू, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती सचिव कुरसांग राजू , सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे.

तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची विश्वसनीय माहिती सोमवारी दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या सी-60 पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच, एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे नक्षलवाद्यांना सी-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि यात 4 नक्षल्यांचा खात्मा झाला. अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथके अतिरिक्त ऑपरेशनचे एसपी यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, एसपीएस रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का पर्वतांमध्ये आज पहाटे शोध घेत असताना सी-60 पथकाचा समावेश असलेल्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांना सी-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 4 नक्षल्यांचा खात्मा केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने सी-60 पथकाला 36 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर देखील परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मागील काही दिवसांत नक्षली पुन्हा एकदा अधिकचे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात शहरी नक्षलवादाचा मुद्दा समोर आला असून, राज्यातील महत्वाच्या शहरातील झोपडपट्टीमधील तरुणांचे मनपरिवर्तन करून त्यांना नक्षली कारवायात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या रडावर शहरी नक्षलवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, नक्षल समर्थक असलेल्या राज्यातील 36 संघटनांची पोलिसांकडून ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.