चारचाकी कोरड्या कॅनॉलमध्ये कोसळून सहा जणांचा मृत्यू

0

मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश

 

सांगली(sangli), २९ मे येथील तासगाव – मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.

मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (६०), सुजाता राजेंद्र पाटील (५५), प्रियांका अवधूत खराडे (३०), ध्रुवा (३), कार्तिकी (१), राजवी (२) यांचा समावेश आहे. तसेच स्वप्नाली विकास भोसले (३०) जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये जोरात आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

या दुर्घटनेतील सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.

कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. त्यामुळे कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. परिणामी गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा