मुंबई : वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत चर्चेचे निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात इंडिया आघाडीमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना तातडीने चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. (Prakash Ambedkar)
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) सहभागी होण्याचे निमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) देण्यात आले होते. मात्र, इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणे आमच्यासाठी अडचणीचे ठरू शकेल, असे आंबेडकरांनी मत व्यक्त केले होते. त्याबाबत दिल्लीमध्ये बैठक झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मान्यता आहे. पण अंतिम निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. राजू शेट्टी सध्या एकला चलो रे च्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचे मला निमंत्रण आलेले नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडण्याची शक्यता आहे. पण राजू शेट्टी मात्र एकला चलो रेच्या भूमिकेवर अजून तरी ठाम आहेत.