राज्यातील शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

0

महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची

🔸सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित नव्या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी, चौथी, सहावीसाठी नवे शिक्षण धोरण लागू करण्यात येईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्वमाध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरले जातील.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार वय 3 ते 8 वर्षापर्यंत बालवाटिका म्हणजे 1,2,3 तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीचा पायाभूत स्तरामध्ये समावेश असेल. त्यानंतर वय 8 ते 11 म्हणजे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी यांचा पूर्वतयारी स्तरामध्ये समावेश असेल.

तर वय 11 ते 14 वयोगट म्हणजे इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी यांचा पूर्व माध्यमिक स्तरात समावेश असेल. तर माध्यमिक स्तरामध्ये 14 ते 18 वयोगट म्हणजे नववी ते बारावी इयत्तेचा समावेश असेल. नव्या धोरणानुसार 10+2+3 या पारंपरिक धोरणाऐवजी आता 5+3+3+4 अशा शैक्षणिक आकृतीबंध असेल.