
(Pune)पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरुच असून पुन्हा एकदा राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. मात्र, शिष्टमंडळासोबत कोणतेही चर्चा झालेली नाही. आपण आधी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत, त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे ओबीसीमधूनच आरक्षणावर आपण ठाम असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. आंदोलकांना मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा असे सांगणार आहे. निर्णय झाला तर ठीक अन्यथा चलो मुंबई यासाठी आम्ही तयार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे, जरांगे आणि शिष्टमंडळात होणारी बैठक महत्वाची ठरणार आहे.
आज शिष्टमंडळ माझ्या भेटीसाठी आले होते. सकाळी आठ वाजता हे शिष्टमंडळ आले. मात्र, मी दहा वाजता उठलो. परंतु, आमची कोणतेही चर्चा शिष्टमंडळाशी झालेली नाही. मी आधी आमच्या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. आमची चर्चा झाल्यावर शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आमच्या वाहनांचे तोंड मुंबईकडे करून ठेवले जाणार आहे. निर्णय झाल्यावर आम्ही पुढे जाणार नाही. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.
शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड हे सतत जरांगेंची भेट घेत आहे. दोन दिवसांपूर्वी मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रांजणगाव गणपती येथे जरांगे यांची भेट घेतली होती. दरम्यान, जरांगे यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज पुन्हा शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आले आहेत.