
एलएडी कॉलेजमध्ये ‘ग्रीन अर्थ – क्लिन अर्थ’ वर राष्ट्रीय परिषद संपन्न
नागपूर, 10 फेब्रुवारी – पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, वायूप्रदूषण झालेले असून त्यासाठी सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. प्रदूषणाच्या विपरीत परिणामांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल पृथ्वी हरित आणि स्वच्छ करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. एल. ए. डी. आणि श्रीमती आर. पी. महिला महाविद्यालयाच्या नियोगी सभागृहात शनिवारी ‘ग्रीन अर्थ – क्लिन अर्थ’ विषयावर राष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते झाले. मंचावर संचिता जिंदाल, माजी सल्लागार (शास्त्रज्ञ G), पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्यासह वुमेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्य डॉ. किरण पाटील व डॉ. रिजूता बापट, संयोजक डॉ. दीपाली चहांदे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ई-प्रोसिडींग चे प्रकाशन करण्यात आले. नागपुरात झालेल्या ढगफुटीमुळे एलएडी कॉलेजचे झालेले आर्थिक नुकसान यावर एक माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
परिषदेत देशभरातून आलेले 150 संशोधक सहभागी झाले होते.पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कॉलेजतर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे डॉ. संजय दुधे यांनी कौतुक केले. पूजा पाठक यांनी स्वागतपर भाषण केले तर दिपाली चहांदे यांनी परिषदेच्या संकल्पनेसंदर्भात विस्तृत माहिती दिली. दुपारच्या सत्रात झालेल्या तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. विशाल सरदेशपांडे, डॉ. राहूल राळेगावकर, डॉ. उत्तरा पांडे व मुकुंद पात्रीकर, प्रवीण मोते व डॉ. अनुपमा कुमार यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच्या सत्रात डॉ. तुतू सेनगुप्ता, डॉ. नंदा राठी, डॉ. संगीता सहस्त्रबुद्धे यांनी शोधनिबंध सादर केले. समारोपीय सत्राला वन संरक्षण विभागाच्या श्रीलक्ष्मी अन्नाबथुला व वुमेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या तनवीर मिर्झा, आनंद भवाळकर व प्रशांत वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. मृणालिनी ठोंबरे यांनी अहवाल सादर केला. मिनाक्षी कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आयुषी देशमुख व स्वरूपा धामणकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. सहसंयोजक प्रचिती बगाडे यांनी आभार मानले.
……
भारत ‘ई-वेस्ट’ मध्ये तिसरा – संचिता जिंदल
पर्यावरणाच्या सर्व समस्या उपभोगवादाशी संबंधित असून पृथ्वीवरील स्त्रोतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताची लोकसंख्या भरमसाठी वाढत असून त्यामुळे कच-याचे प्रमाणही वाढत आहे. जगात प्लॅस्टीक कचरा निर्माण करण्यात भारताचा पाचवा तर ई-वेस्ट तयार करण्यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती संचिता जिंदल यांनी दिली. ‘वेस्ट मॅनेजमेंट फॉर क्लिन अँड ग्रीन अर्थ’ विषयावर त्या मुख्य भाषण करीत होत्या. यावर शाश्वत कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र हे उपाय फायदेशीर ठरू शकतात, असे त्या म्हणाल्या. त्यांनी भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्या विविध पर्यांवरण संवर्धन विषयक योजनांची माहिती दिली.
भगरीच्या पिठाचे झटपट होणारे तोंडुळे | Shankhnaad News #shankhnaadnews #live